गुरुवार, 20 दिसंबर 2018

आपली उपेक्षित राष्ट्रिय सौर दिनदर्शिका

आपली उपेक्षित राष्ट्रिय सौर दिनदर्शिका

भाग -१

आपल्या शालेय अभ्यासक्रमात कायमपणे अनुल्लेखित राहिलेल्या बऱ्याच
गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रिय सौर दिनदर्शिका. याची माहिती
सर्वासामान्यांपर्यंत पोचावी म्हणून हा लेख-प्रपंच.
रोज पहाटे सूर्योदय होतो व सायंकाळी सूर्यास्त होतो. या सूर्याच्या गतिमुळे सर्व
प्राण्यांच्या शरीरात बदल होत असतात. मुख्य म्हणजे झोप येणे ही क्रिया
सूर्याशी निगडित असते. त्यामुळे अनादिकाळापासून मानवाच्या कालगणनेत सूर्य
हा महत्वाचा बिंदू होता हे उघड आहे.
पृथ्वी अवकाशात स्वतः भोवती फिरते त्यामुळे दिवस-रात्र होतात. फिरणाऱ्या
पृथ्वीगोलाचा जो भाग सूर्याकडे असतो तिथे दिवस आणि जो भाग सूर्यापासून
लपला जातो तिथे रात्र असते. याखेरीज पृथ्वी सूर्याभोवती देखील एका
दीर्घवर्तुळाकार मार्गावर फेरी मारते. याला सूर्य व पृथ्वीमधील गुरूत्वाकर्षण
कारणीभूत असते. या मार्गावर एक दीर्घवर्तुळ पूर्ण करायला पृथ्वीला सुमारे ३६५
दिवस लागतात.
हे इतके दिवसांचे मोजण्याचे काम माणसाने कसे केले ? याचे सोपे उत्तर आहे -
रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करून केले. आपणही असे निरीक्षण केले तर लक्षात
येते की रोज सायंकाळी पूर्वेकडून उगवणाऱ्या चांदण्या वेगवेगळ्या असतात. मात्र
त्यापैकी बहुतेक सर्वांची एकमेकांच्या तुलनेतील अंतरे व स्थिती बदलत नाहीत.
खरे तर सूर्य, चंद्र व इतर ६ चांदण्या, म्हणजे शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध,व ध्रुव
एवढ्या गोष्टी सोडल्या तर इतर चांदण्यांची आपापसातील स्थिती सारखीच
रहाते. शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध यांना ग्रह असे नाव दिले गेले आणि त्यांच्या
भ्रमणाबद्दल माहिती गोळा करून प्रत्येकाचे वेगळे गणित पण मांडले. गणित

व खगोलशास्त्रांत पारंगत भारतियांनी हजारो वर्षांपूर्वीच या विषयीचा अभ्यास
केला.
इतर चांदण्यांपैकी कांही विशिष्ट चांदण्या मिळून एखादा विशिष्ट आकार तयार
होतो. त्या आधारे आकाशाचे २७ भाग पाडून प्रत्येक भाग ओळखता येईल अशी
खूण असलेल्या चांदण्यांना एकेका नक्षत्राचे नाव दिले. यावरून लक्षांत आले की
सूर्य, चंद्र व शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध या चांदण्या वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरत
जातात.
पृथ्वी फिरते या शब्दांएवजी घटकाभर सूर्य फिरतो असे शब्द वापरले तर सूर्य
एखाद्या नक्षत्रापासून सुरूवात करून सर्व नक्षत्रांची फेरी पूर्ण करून पुनः पहिल्या
जागेवर येण्यासाठी सुमारे ३६५ दिवस घेतो. त्याला १ वर्ष किवा संवत्सर असे
नाव पडले. सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे हे ओळखण्याकरिता त्याच्या बरोबर उलट
बाजूला असलेल्या नक्षत्राचा अधार घेतला जातो.
चंद्र देखील एका नक्षत्रापासून सुरूवात करून फिरतो आणि सर्व २७ नक्षत्रांची
फेरी एका दिवसात सुमारे १ नक्षत्र याप्रमाणे पूर्ण करतो. मात्र पृथ्वीच्या
सूर्याभोवतीच्या गतिमुळे एक फेरी संपवून पुनः पहिल्या जागी येण्यासाठी चंद्र
सुमारे साडे एकोणतीस दिवस घेतो.
याप्रमाणे चांद्रमासाचे दिवस वाढतात. शिवाय चंद्रकोरीचा आकारही या
दिवसांमधे सदा बदलत रहातो. त्यामुळे चंद्रावरून तिथी मोजणे कधीही सोपे. या
मोजमापासाठी प्रतिपदा ते पंचदशी ( म्हणजे पौर्णिमा किंवा अमावस्या), कृष्ण व
शुक्ल पक्ष आणि सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा एक चांद्रमास हे गणित
मांडले गेले.
आता ध्रुवताऱ्याची गोष्टच वेगळी. हा आकाशात उत्तर दिशेला एकाच जागी स्थिर
आहे. आणि स्वतःभोवती गरगर फिरणाऱ्या पृथ्वीचा आस (किंवा अक्ष) याच्या
दिशेत आहे म्हणूनच इतर नक्षत्रे आकाशात फिरती दिसली तरी हा स्थिरच
दिसतो. इतकेच नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती ज्या लम्बवर्तुळाकार मार्गावर फिरते

त्या मार्गाला पृथ्वीचा अक्ष लम्बकोण करत नसून तो ध्रुवाकडे वळलेला
असल्याने लम्बवर्तुळाकार मार्गाशी २३ अंशाचा कोण करतो. त्यामुळे सूर्याची
किरणे पृथ्वीवर येतात तेंव्हा सगळीकडे लम्बरूपात न पडता कमी जास्त
प्रमाणात पडतात. त्यामुळे एका वर्षाचे सर्व दिवस-रात्र सारखे रहात नाहीत व
त्यांच्या ऋतुमानातही फरक पडतो. वर्षांतील दोनच दिवस असे असतात जेंव्हा
संपूर्ण जगभर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. इतर दिवशी
दिनमान व रात्रीमान सारखे नसते. या दोन दिवसांना वसंत संपात व शरद
संपात अशी नावे पडली. भारतातच या गणना झाल्या. वसंत संपातानंतर वसंत,
ग्रीष्म, वर्षा असे ऋतु येतात तर शरद संपातानंतर शरद, हेमंत, शिशिर असे ऋतु
येतात. या प्रमाणे भारतात सहा ऋतूंचा निसर्ग असतो.
ऋतुकाळाप्रमाणे वातावरणात शीतोष्ण असेही फरक होतात, धान्याची बीजे
अंकुरित होतात, फुले येतात, फळे येतात, धान्य पिकते, वगैरे. या सर्वांचे निरिक्षण
करून सहा ऋतूंच्या बारा महिन्यांना नावे दिली ती अशी -- वसंत ऋतूत मधु
आणि माधव म्हणजे फुलांमधे मधसंचय होऊन पुढे फळधारणेला सुरूवात होते.
ग्रीष्म ऋतूतील दोन महिने हे शुक्र आणि शुचि नावाने आहेत. त्यावेळी सूर्याची
ऊष्णता वाढून जमीन खूप तापते. ती उष्मा धारण करते ज्यायोगे पुढे बीज
अंकुरण्यासाठी आवश्यक ती उर्जा मिळावी. नंतर येणाऱ्या मानसूनपूर्व पावसामुळे
धरती शुद्ध होण्यास सुरूवात होते. म्हणून ग्रीष्मातील महिने शुक्र व शुचि.
वर्षा ऋतुतील दोन महिने नभ आणि नभस्य. इथे नभस्य शब्दाचा अर्थ नभ
मासातून उद्भवलेला किंवा नभ मासातील फळापेक्षा पुढचे फळ देणारा असा
आहे. शरद ऋतुतील मासांची नावे इष व ऊर्ज अशी आहेत. इषचा अर्थ रस. तर
शरद महिन्यात पिकांमधे रस भरण्यास आरंभ होतो. हेमंतातील महिने सह
आणि सहस्य तर शिशिरातील महिने हे तप आणि तपस्य हे होत. सह आणि
सहस्य मासात थंडीचा प्रभाव सर्वाधिक असतो. परन्तु तप व तपस्य महिन्यांमधे
पुन्हा एकदा पृथ्वीवरील उष्णता वाढायला सुरूवात होते व दिनमानही मोठे
होते.याप्रकारे मधु-माधव, शुक्र-शुचि, नभ-नभस्य, इष-ऊर्ज, सह-सहस्य, व तप-
तपस्य अशी सूर्यावरून किंवा ऋतुचक्रावरून नावं पडली.

अर्थात् हे सर्व निरीक्षण वैदिक कालीन ऋषींनी केले असल्यामुळे ही नावे
भारतीय ऋतुमानाप्रमाणे आहेत हे उघड आहे.
आकाशातील नक्षत्रांना अनुक्रमे अश्विनी, भरणी, कृत्तिका –--- रेवती अशी नावे
पडली व त्या सर्वांचा स्वामी चंद्र मानला जातो. चंद्राचे तेज हे सूर्याच्याच
तेजातून निर्माण होते अशा अर्थाचा एक यजुर्वेदीय मंत्र आहे. मात्र चंद्रप्रकाशाचे
वेगळे महत्व आहे. कारण ज्या प्रमाणे वाढीसाठी सूर्याची ऊर्जा हवी त्याच प्रमाणे
रस-उत्पत्तिसाठी चंद्रप्रकाश हवा असे कित्येक ग्रंथांनी नोंदवून ठेवले आहे.
आता आपण चांद्रमासांची नावे देण्याची पद्धत पाहू या. ही नावे सौरमास
म्हणजेच ऋतुमासांपेक्षा वेगळी आहेत हे महत्वाचे.
दर पौर्णिमेला चंद्र हा सूर्याच्या अगदी समोर असताना तो ज्या नक्षत्रात असेल
त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचे नाव पडते. २७ नक्षत्रांपैकी फक्त १२ नक्षत्रेच
अशी आहेत जिथे चंद्र असताना पौर्णिमा येते. नक्षत्रांचा आकाशातील आकार
लहान मोठा असल्याने तसे होते. या प्रमाणे येणाऱ्या चांद्रमासांची नावे चैत्र,
वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्घशीर्ष, पौष, माघ व
फाल्गुन अशी आहेत. याचाच अर्थ असा की भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु,
आश्लेषा, पूर्वा, ह्स्त, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, शततारका, उत्तर
भाद्रपदा व रेवती या नक्षत्रांमधे पौर्णिमेचा चंद्र कधीच येत नाही.
आता सप्ताहाचे सात दिवस व त्यांची नावे कशी ठरली ते पाहू. पृथ्वीवरून फिरते
दिसणारे ५ ग्रह, तसेच सूर्य, व चंद्र यांना त्यांच्या गति प्रमाणे मांडले तर ते असे
येतात -- शनि हा सर्वात हळू, मग गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, आणि चंद्र हा
सर्वात जलद. आता दिवसाचे (अहोरात्र) एकूण २४ होरा असे २४ भाग केले
(अहोरात्र या शब्दातील मधली दोन अक्षरे घेऊन होरा हा शब्द बनला).
सूर्योदयापासून पहिला तास सूर्याचा होरा मोजला त्या दिवसाला रविवार असे नाव
दिले. पुढील एकेका तासाच्या होऱ्याची नावे शुक्र, बुध, चंद्र, शनि, गुरु, मंगळ, सूर्य
…..... अशी चक्राकार पध्दतीने मोजली की दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला चंद्राचा
होरा येतो - म्हणून तो सोमवार. त्याच्या पुढे दर दिवशीच्या सूर्योदयाला अनुक्रमे

मंगळाचा होरा, बुधाचा, गुरुचा, शुक्राचा व शनिचा होरा येतो. अशा प्रकारे
सप्ताहाच्या सात दिवसांची नावे ठरली. ती इतकी चपखल बसली की सर्व जगभर
आजही तीच वापरली जातात. त्याचे गणित हे असे आहे.
अशा प्रकारे भारतियांनी सूर्याच्या गतिचे महत्व व त्यानुसार बदलणारे ऋतू
ओळखून सौरपंचांग तयार केले, शिवाय नक्षत्रमार्गावरील चंद्रची गति व त्याच्या
कला सहज डोळ्यांना दिसण्यासारख्या असतात त्यावरून चांद्रपंचांग तयार झाले.
सामान्य माणसाला चंद्रावरून कालगणना सोपी होती.
अमावस्येला चंद्र व सूर्य आकाशात एकाच अंशावर उगवतात. त्याच्या पुढल्या
दिवशी चंद्र १२ अंश किंवा ४८ मिनिटे मागे पडतो, व तिथून पुढे हे अंतर
वाढतच जाते, त्याचबरोबर चंद्राचा आकारही वाढतो त्यामुळे सामान्य
माणसालाही तिथी ओळखणे अतिशय सहजपणे जमू शकते. चांद्रपंचांगाची
लोकप्रियता याच कारणासाठी असते. पुढे जेंव्हा भारतात फलज्योतिष हे शास्त्र
उदयाला आले तेंव्हा चांद्रपंचांगाचे महत्व अधिकच वाढले.
सारांश हा की भारतात अगदी वैदिक काळापासून चांद्रमास व सौरमासाची
गणना, सप्ताहातील वार, महिने, त्यांची नावे, संवत्सराची नावे, ऋतूचक्र -
त्याप्रमाणे शेतातील कामे असे सर्व पद्धतशीरपणे तयार होत गेले. ही पध्दत थेट
अठराव्या शतकापर्यंत चालू राहिली. पुढे ब्रिटिश राजवटीनंतर देशात इंग्रजी
कॅलेंडर लागू झाले. स्वातंत्र्यानंतर कॅलेंडरबाबत बराच खल होऊन एक भारतीय
सौर पंचांग निश्चित करण्यात आले. त्याबद्दल आपण पुढच्या भागात पाहू.

भारतीय राष्ट्रिय सौर कालदर्शिका -- भाग २

मागील लेखात आपण पाहिले की भारतात ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी इथे भारतीय कालगणनेनुसार सौर चांद्र अशी दोन्हीं पंचांगे प्रचलित होती. त्यामधील चांद्रपंचांग सर्वसामान्यांच्या दृष्टीने अधिक सोपे होते कारण दर रात्री चंद्राच्या कलेवरून तिथीचा अंदाज काढता येतो.

मात्र ब्रिटिशांनी ही दोन्ही पंचांगे रद्द ठरवून ब्रिटिश कॅलेण्डर लागू केले ते सुमारे दीडशे वर्षे -- म्हणजे सुमारे पिढ्या लागू होते. जरी त्या काळांत भारतीय पद्धतीने पंचांगे तयार होत राहिली तरी दर पुढची पिढी त्यातील थोडा थोडा भाग विसरत होती आधुनिकतेकडे कल असणारी मंडळी देखील पंचांग म्हणजे वैश्विक गणित हे समीकरण विसरून पंचांग म्हणजे थोतांड असे म्हणण्यात धन्यता मानू लागली होती. तरीही पंचांगांचा अभ्यास करून पुढील वर्षाचे पंचांग बिनचूक तयार करण्यात प्रवीण असणारी मंडळी देशभरात होती. त्याहीपुढे जाऊन कालमानाप्रमाणे पंचांगाच्या गणितामधे घडत असलेल्या सूक्ष्म बदलांचे भान ठेऊन त्यामधे योग्य त्या सुधारणा करू शकणारे क्षमतावान विद्वानही होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, शंकर बाळकृष्ण दीक्षित, माधवचंद्र चट्टोपाध्याय, पं. मदनमोहन मालवीय, श्री संपूर्णानंद इत्यादींनी कालगणना सुधारणेच्या दृष्टीने भरपूर प्रयत्न केले होते हा अगदी अलीकडील इतिहास आहे. यावरून भारतीय पंचांगांची कालगणना व परंपरा किती खोलवर रुजलेले आहेत हे आपण ध्यानात घेऊया.

१९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि मग पारतंत्र्याची प्रतीके झुगारून देऊन, एक स्वतंत्र्य देश या नात्याने स्वतःची अशी राष्ट्रीय प्रतीके निर्माण करण्यास जोमाने सुरुवात झाली. उदा. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इत्यादी. त्याचबरोबर आपली स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना असावी असा विचार पुढे आला. तेंव्हा भारतात साधारणतः तीस निरनिराळ्या प्रकारच्या कालगणना पद्धती प्रचारात होत्या. म्हणून एक समिती नेमून समितीने सर्व देशभरासाठी एकच राष्ट्रीय कॅलेण्डर तयार करावे असे ठरले. हे केल्याने संपूर्ण भारतभर एकच राष्ट्रीय कालगणना असेल जेणेकरून भारतीयांच्या मनातील राष्ट्रीय अस्मिता एकात्मतेची भावना वाढीस लागेल.

तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक व औद्योगिक मंडळाने नोव्हेंबर १९५२ मध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी 'कॅलेंडर रिफॉर्म' कमिटीची स्थापना केली. प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. यातील अन्य सदस्य
) प्रा. . सी. बॅनर्जी ( अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू)
) डॉ. के. . दप्तरी (बी. ., बी.एल., डी.लिट., नागपूर)
)श्री. . . करंदीकर ( संपादक, केसरी, पुणे)
)डॉ. गोरखप्रसाद ( गणि विभागप्रमुख, अलाहाबाद विद्यापीठ)
) प्रा. आर. व्ही. वैद्य ( माधव कॉलेज, अलाहाबाद)
)श्री. एन. सी. लाहिरी (पंचांगकर्ते, कलकत्ता)
असे होते. हे सर्व पंचांगाच्या विभिन्न मुद्द्यांशी निगडित विषयांमधे तज्ज्ञ असे लोक होते.
त्यांच्या शिफारसींनुसार त्यांनी तयार केलेल्या भारतीय सौर कालदर्शिकेचा स्वीकार करून भारत सरकारने २२ मार्च १९५७ या दिनांकापासून म्हणजेच चैत्र १८७९ सौर शक या भारतीय सौर दिनांकापासून ते लागू केले. सर्व शासकीय राजपत्रांमध्ये राजकीय पत्रव्यवहारात सौर दिनांकाचा उल्लेख असेल तरच ती कागदपत्रे वैध ठरतात. खास करून परराष्ट्रांसोबत जे करार ठरतात त्यावर आवर्जून भारतीय सौर दिनांक लिहिवाच लागतो. रिझर्व्ह बॅंकेनेदेखील सौर दिनांकाचा अंगीकार सर्व बँकांनी करावा असे आदेश काढले असल्याने बँक व्यवहारात आपण सौर दिनांक असा उल्लेख करीत हा दिनांक लिहिला तर बँक ते कागदपत्र नाकारू शकत नाही. पूर्वी काही बँकांनी नकार दिल्यावरून रिझर्व्ह बँकेने त्यांना दंड ठोठावल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

आता राष्ट्रिय दिनदर्शिका तयार करताना समितिने काय सूत्र वापरले ते आपण पाहू या. देशात त्या वेळी वापरात असणाऱ्या सर्व पंचांगांची तपासणी करून संपूर्ण भारतासाठी शास्त्रीय पद्धतीवर आधारलेली, बिनचूक दिनदर्शिका तयार करण्याचे काम समितीवर होते. समितीने देशातील विविध पंचांगकर्त्यांना व जनतेला आपली मते कळविण्याचे आवाहन केले. त्यातून समितीला एकूण ६० पंचांगे प्राप्त झाली. त्या सर्वांचा अभ्यास करून, भारताची अधिकृत दिनदर्शिका म्हणून 'भारतीय सौर दिनदर्शिके' ची रचना करण्यात आली.

भारतातील चांद्रपंचांगानुसार चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडव्याला वर्षारंभ सुरू होतो जो २२ मार्चच्या जवळपास असतो, तर सौर कालगणनेत वसंतसंपात किंवा विषुवदिन अर्थात २२ मार्च अधिक महत्वाचा आहे. हाच समसमान दिवसरात्र असल्याने जगभरात याचे महत्व आहे. सबब राष्ट्रिय दिनदर्शिकेसाठी २२ मार्च हा वर्षारंभ ठरविण्यात आला. सूर्य दररोज सरासरी १ अंश पूर्वेकडे सरकतो आणि सुमारे ३६५ दिवसात आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्याच्या या आकाशीय भासमान मार्गास आयानिक वृत्त असे म्हणतात. आयनिक वृत्त व विषुववृत्त दोन ठिकाणी एकामेकांस छेदतात. या बिंदूपाशी सूर्य आला असता पृथ्वीवर प्रत्येकी १२-१२ तासांचे म्हणजेच समसमान लांबीचे दिवस व रात्र असतात. २२ मार्च हा वसंतसंपात दिन आणि २३ सप्टेंबर ा शरदसंपातदिन. यापैकी २२ मार्च रोजी वसंत ऋतू सुरू असतो. २२ मार्चनंतर सूर्य उत्तरावर्त्ती होऊन आयानिक वृत्तावर उत्तरेकडे जात जात २२ जूनला विषुवापासून उत्तरतम अंतरावर म्हणजेच कर्कवृत्तावर येतो. त्या दिवसापर्यंत उत्तरायण चालू असते पण २२ जूनला ते संपून सूर्याचे दक्षिणायन म्हणजे दक्षिणेकडे वाटचाल सुरु होते, पण अजूनही तो उत्तरावर्त्ती अर्थात विषुवाच्या उत्तरेलाच असतो. २३ सप्टेंबर अथवा शरदसंपातदिनी पुन्हा सूर्य विषुववृत्तासमोर असल्याने दिवस रात्र समसमान असतात. तिथून पुढे यूर्य दक्षिणावर्त्ती राहून दक्षिणाभिमुख प्रवास करीत २२ डिसेंबर रोजी दक्षिणतम अंतरावर मकरवृत्तासमोर येतो व परत उत्तरेकडे वाटचाल सुरु करतो.

पृथ्वीवरुन दिसणारे सूर्याचे हे भासमान भ्रमण नियमितपणे व अखंडितपणे चालू असते. त्यावर आधारित कालगणना डॉ. साहा यांच्या समितीने सुचविली. 'भासमान भ्रमण' असा शब्दप्रयोग करण्याचे कारण म्हणजे, वास्तवात सूर्य हा स्थिर आहे. पृथ्वी ही स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आपल्याला सूर्य उगवला, मावळला असे वाटते. त्याचबरोबर आकाशात निरनिराळ्या राशींमधून देखील पृथ्वी फिरत असते. आपण पृथ्वीवर असल्याकारणाने आपल्याला पृथ्वी स्थिर सूर्य चल असल्याचा भास होतो. म्हणून याला सूर्याची भासमान गति म्हणतात.

समितीने भासमान भ्रमणाशी निगडीत चारही दिवस हे दर तिमाहीसाठी प्रारंभदिन ठरवून या दिनदर्शिकेची खगोलीय घटनांची सांगड घातली. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ ..... ही नावे भारतात सर्वत्र प्रचलित असल्याने सर्व महिन्यांंना तीच नावे देण्यात आली. मार्गशीर्ष महिन्याचे अग्रहायण हे नाव भारतात बहुसंख्येने प्रचलितहे, तेच समितीने घेतले.
या दिनदर्शिकेनुसार महत्त्वाचे दिवस-
१ चैत्र हा २२ मार्च, वसंतसंपात बिंदू (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३०, ३१, ३१ एकूण ९)
१ आषाढ हा २२ जून, दक्षिणायनारंभ बिंदू - (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३, ३१, ३१ एकूण ९)
१ अश्विन हा २३ सप्टेंबर, शरदसंपात बिंदू (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३, , एकूण ९)
१ पौष हा २२ डिसेंबर, उत्तरायणारंभ बिंदू (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३, , एकूण ९)
अशा प्रकारे उत्तरायणात १८५ व दक्षिणायनांत १८० दिवस. लीप वर्ष असेल तेंव्हा चैत्र मासाचे पण ३१ दिवस असले की हे कॅलेण्डर व्यवस्थित लागू होते.

ऋतुचक्र व महिने यांचे नाते असे राहील – फाल्गुन चैत्र –वसंत ऋतु, वैशाख-ज्येष्ठ ग्रीष्म ऋतु, आषाढ-श्रावण वर्षा ऋतु , भाद्रपद-अश्विन शरद ऋतु, , कार्तिक-मार्गशीर्ष हेमंत ऋतु पौष-माघ शिशिर ऋतु.

३६५ दिवसांची महिनावार विभागणी करताना वैशाख ते भाद्रपद हे उत्तरायणातील ५ महिने प्रत्येकी ३१ दिवसांचे तर अश्विन ते फाल्गुन हे दक्षिणायनातील सहा महिने प्रत्येकी ३० दिवसांचे ठेवले आहेत. चैत्र महिन्यात सामान्य वर्षात ३० तर वृद्धिवर्षात लीप वर्षात ३१ दिवस असतील. या विभागणीमागेही शास्त्रीय कारण आहे. पृथ्वी सूर्याभोवती शुद्ध गोलाकार मार्गाने न फिरता, विवृत्ताकार मार्गाने फिरते. विवृत्तास दोन केंद्रबिंदू ( नाभीय बिंदू ) असतात. ते विवृत्ताच्या मध्यापासून काही ठरावीक अंतरावर असतात. सूर्य यांपैकी एका बिंदूवर असतो. त्यामुळे पृथ्वीची कक्षेची एक बाजू सूर्यापासून जवळ तर दुसरी बाजू सूर्यापासून दूर असते. ज्या वेळी पृथ्वी उपसूर्य म्हणजेच सूर्यापासून जवळ असणाऱ्या कक्षेच्या भागात असते, त्या वेळी सूर्याची भासमान गती जास्त असते, तर जेव्हा पृथ्वी अपसूर्य भागात ( सूर्यापासून दूर ) असते तेव्हा सूर्याची भासमान गती कमी असते. त्यामुळे वसंत संपातापासून शरद संपातापर्यंतच्या प्रवासात सूर्याला १८५ दिवस लागतात. तर शरद संपातापासून वसंत संपातापर्यंतच्या प्रवासात १८० दिवस पुरतात. त्यामुळे सूर्याचा मेष ते कन्या राशीत असण्याचा काळ हा तूळ ते मीन राशीत असण्याच्या काळापेक्षा जास्त आहे. म्हणून वैशाख ते भाद्रपद हे महिने ३१ दिवसांचे तर अश्विन ते फाल्गुन हे महिने ३० दिवसांचे ठरवले. १ चैत्र या दिवशी सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो. १ वैशाख या दिवशी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. अशा प्रकारे १२ महिने हे एकेका राशींशी निगडीत आहेत. या दिनदर्शिकेला सूर्याशी निगडित ठेवण्याने एक सोपेपणा असा आला कि गरज लागेल तेंव्हा या व ग्रेगॅरियन कॅलेंडरांची सांगड घालणे अतिशय सोपे व अपरिवर्तनीय आहे. 

'कॅलेंडर रिफॉर्म कमिटी'ने तयार केलेली ही नवी कालगणना शासनाने १ चैत्र १८७९ ( २२ मार्च १९५७) या दिवसापासून स्वीकारली पुढीलप्रमाणे निर्णय घेतला.
) भारताच्या गॅझेटवर इंग्रजी दिनांक नंबराबरोबर नवीन भारतीय दिनांक छापण्यात येईल.
)आकाशवाणीवरून ( तसेच साध्या दूरदर्शनवरुन ) निरनिराळ्या प्रादेशिक भाषांत वार्ता सांगताना इंग्रजी तारखांबरोबर नवीन भारतीय दिनांक सांगण्यात येईल.
) सरकरी कॅलेंडरवर इंग्रजी तारखांच्या जोडीने नवे भारतीय दिनांकही दाखवण्यात येतील.

अशा प्रकारे केलेली दिनदर्शिका लागू होऊन आज ५२ वर्षे उलटून गेली, तरी या दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार झालेला नाही. त्यामुळे ही दिनदर्शिका तयार करण्यामागचा जो हेतू होता, तो साधला गेला नाही. भारतीय पंचांगातील नक्षत्रे, महिने, वार या शास्त्रीय पायावर आधारित गोष्टींचा हिरिरीने पुरस्कार न करता अशास्त्रीय असे ग्रेगारियन कॅलेण्डरही पर्याय म्हणून उपलब्ध ठेवल्याने लोक तोच वापरत राहिले. जी गत इंग्रजीच्या तुलनेत इतर भारतीय भाषांची झाली तीच गत राष्ट्रिय सौर कॅलेण्डरची झाली. संसदेने स्वीकार केला तरी लोकजीवनात उतरण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

डॉ.साहा समितीने संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यामातून ही दिनदर्शिका जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला होता कारण जगाच्या दृष्टीनेही हे अतिशय शास्त्रीय आहे. त्याऐवजी ती भारतातच आठवणीतूनही मागे पडत गेल्याचे दिसून येते. फक्त शासकीय औपचारिक राजपत्रांमध्ये व नैमित्तिक पत्रव्यवहारात तसेच इतर राष्ट्रांशी करारपत्र करताना, भारतीय सौर दिनांकाचा उल्लेख केला जातो. खरेतर आपल्यापैंकी प्रत्येकाने सौर दिनदर्शिका वापरण्याचे ठरविले तरच ती अधिकाधिक सार्थक होऊ शकेल.

पण तसे न घडण्यामागे अस्मितेची जाणीव नसण्याबरोबरच एक व्यावहारिक समस्या आहे असे मला वाटते, म्हणून तोही उहोपोह इथे करीत आहे .

वैदिक काळापासूनच आपल्याकडे सौर व चांद्र अशी दोन्ही पंचांगे चालत आली आहेत. सौर पद्धतीने आपल्याला सप्ताहाचे सात वार दिले, आपली कित्येक व्रतवैकल्ये व अनुष्ठाने त्या त्या वारावर केली जातात उदा सोळा सोमवार. तसेच सूर्याच्या भासमान गतिनुरूप येणारे वसंतसंपात बिंदु व शरदसंपात बिंदू यांची नोंद घ्यायला शिकवले. दक्षिणायन, उत्तरायण तसेच सूर्याचे दक्षिणावर्त्त व उत्तरावर्त्त हे शब्द व्याख्यायित झाले. ऋतुचक्राप्रमाणे भिन्नत्वाने येणाऱ्या वायुमंडलाची, शीतोष्ण कालमानाची व शेतीसाठी योग्यायोग्यतेची ओळख आपल्या पूर्वजांनी करून घेतली. सहा ऋतुवरून बारा मासांची नावे ठरली ती मधु-माधव, शुक्र-शुचि, नभ-नभस्य, इष-उर्ज, सह-सहस्य व तप-तपस्य अशी होती. या नावांवरूनच त्या त्या मासातील शेती, वायुमान व आकाशातील मेघगतीची कल्पना यावी अशी नावे योजिली होती. त्याही पुढे जाऊन दीर्घकालीन कालगणनेची पद्धत पण आत्मसात केली होती. आपल्या पूर्वज खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा व्यास, पृथ्वीपासून चंद्र-सूर्याचे अंतर इत्यादींची गणिते मांडली. युगांची संकल्पना येऊन सत्य, त्रेता, द्वापर व कलियुग मिळून एक चतुर्यग, अशा ७१ युगांचा एक ब्रह्मदिवस, त्यानंतर तेवढीच मोठी एक ब्रह्मरात्र, अशा ३६० दिवसांचे एक ब्रह्मवर्ष व १०० वर्षांचे ब्रह्मदेवांचे आयुष्य व असे कित्येक ब्रह्मदेव इथपर्यंत भारतियांची कल्पना गेली होती. विशेष म्हणजे अशा प्रकारातून वर्तवलेले पृथ्वीचे संभावित आयुष्य वर्तमानातील अंदाजांशी इतके मिळते जुळते आहे की कोणाही भारतियाला अशा कालगणनेचा अभिमान वाटावा. असो. पण यातील आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे गणिताच्या सोईसाठी जरी तीनशेसाठ दिवसांचे एक वर्ष मानले असले तरी सूर्याला एक भ्रमण पूर्ण करायला वस्तुतः ३६५ दिवसांपेक्षा थोडा अधिक काळ लागतो, त्याचप्रमाणे आयनिक वृत्त व आकाशीय विषुववृत्त यांचे छेदन बिंदु म्हणजेच वसंत व शरदातील संपातबिंदु यांची जागा देखील नक्षत्रांच्या सापेक्ष बदलते, व साधारणपणे एक सहस्र वर्षात तीस दिवस मागे सरकते हे ज्ञानही होते.

आता चांद्र पंचांगाबाबत बोलायचे तर तिथे चंद्राच्या दृश्य कलांच्या आधाराने प्रतिपदा ते पौर्णिमा (किंवा अमावास्या) अशी पाक्षिक गणना आहे. तसेच पौर्मिमेच्या चंद्राच्या नक्षत्रस्थितिवरून १२ महिन्यांची नांंवे ठरली ती चैत्र-वैशाख-ज्येष्ठ इत्यादि होत. याचाच अर्थ असा की चांद्रमासाची पहिली तिथि प्रतिपदा आणि सौरमासाचा पहिला दिवस यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मग या दोन पंचांगांची आपापसात सांगड घालतांना तीन गोष्टी पाहिल्या गेल्या. एक म्हणजे वसंतसंपात बिंदु जो साधारणपणे सहस्र वर्षात तीस दिवस मागे सरकतो, त्याची सुरुवात दोन्हीं पंचांगामधे एकच असेल- ही दीर्घकालिक व्यवस्था होती. याउलट अल्पकालिक योजना म्हणजे जी चांद्रतिथी सूर्योदय पहात नसेल तिचा क्षय मानायचा. यामुळे चांद्रमास कधी २८ कधी २९ व कधी ३० दिवसांचा असू शकतो, पण त्यामुळे अमावास्या व पौर्णिमेची सूर्याबरोबर सांगड घातली जाते. याखेरीज एक मध्यकालिक योजना म्हणजे अधिकमासाची गणना. सुमारे तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिकमासामुळे नैसर्गिक ऋतुचक्राबरोबर चांद्रमासाची सांगड घातली जाते. यामुळे शतकानुशतके उलटली तरी ज्या-त्या महिन्यातील तिथीनुरूप शेतीची कामें ठरविली जा शकतात व त्यांना निसर्गाची उत्तम साथ लाभते.

अशा प्रकारे सौरमास व चांद्रमासांचे वेगळेपण आहे. चंद्र हा नक्षत्रांचा स्वामी आहे तर सूर्य हा दिनकर म्हणजे दिवस घडवणारा व ऋतुंचा स्वामी आहे. सौरमासांची वेगळी नावे आहेत ती ऋतुमानानुसार अर्थवाही आहेत तर चांद्रमासांची नावे नक्षत्रानुकूल असून दृश्य चंद्रकलांशी त्यांचा थेट संबंध आहे.
असे असताना राष्ट्रिय कालदर्शिका समितिने आपले कॅलेण्डर तर सौरगतिनुसार ३६५ दिवसांचे असेल पण त्यातील मासांची नावे मात्र चैत्र-वैशाख-ज्येष्ठ अशी चांद्र नावे असतील असा निर्णय का घेतला हे मला अनाकलनीय आहे. रात्रीच्या चंद्रकोरीकडे पाहून तिथि व आजूबाजूच्या चांदण्यांकडे पाहून त्या दिवसाचे चांद्रनक्षत्र तसेच त्या महिन्याचा चांद्रमास ओळखता येतो व सर्वसामान्य माणसाला ते चांद्रपंचांगच अधिक माहितीचे असते. अशा परिस्थितीत दिनगणना सूर्यगतिनुसार १ ते ३० किंवा १ ते ३१ दिवसांचा एक महिना पण मासगणना मात्र चंद्राच्या नावाने अशी केल्याने सामान्य माणसासाठी अत्यंत गोंधळाची परिस्थिति उद्भवेल हा अंदाज समितिला करता आला नाही का? इथे एक लक्षात घेतले पाहिजे की चांद्र व सौरमासांची वेगवेगळी नावे हजारो वर्षांच्या कालगणना पद्धतीतून दीर्घकाळापासून चालत आलेली आहे. अशी कालगणना हा कुठल्याही संस्कृतीचा फार मोठा खगोलीय ठेवा असतो. आपल्याला रामायणपूर्वीच्या ग्रंथांमधूनही ग्रहनक्षत्रस्थितिचे केलेले वर्णन आढळते. याच कारणासाठी जगभरातील सर्वाधिक प्रगत अशी अमेरिकेतली नासा ही संस्था जेंव्हा खगोलीय कम्प्यूटर सॉफ्टवेअर विकसित करते तेंव्हा ते ग्रेगॅरियन कॅलेण्डर प्रमाणे नसून ज्यूलियन कॅलेण्डर प्रमाणे असते कारण तसे केले तरच पाच-सातशे वर्षांपूर्वींच्या यूरोपातील खगोलीय नोंदींचा लाभ घेतला जाऊ शकतो. असे असताना आपल्या हजारो वर्षांच्या खगोलीय नोंदींच्या परंपरेत आपणच गोंधळ का निर्माण करावा ?

या गोंधळाला टाळण्याचा एक अतीव सोपा उपाय आहे. सध्याच्या राष्ट्रिय सौर दिनदर्शिकेमधे इथून पुढे महिन्यांची नावे चांद्रमासांप्रमाणे नसून वैदिक सौरमासांची नावे असतील एवढा छोटासा बदल संसदेने मंजूर करावा. म्हणजेच २२ मार्चला सुरू होणाऱ्या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला १ चैत्र असे म्हणायाचे नाही व जणू काही ती चैत्र शुद्ध प्रतिपदा (१ ली तिथि) आहे असा भ्रम निर्माण करायचा नाही. त्याऐवजी त्या दिवसाला १ मधूमास म्हणायचे. दरवर्षीचा १ मधुमास हा दिवस नेहमीच ग्रेगॅरियन कॅलेण्डरच्या २२ मार्चला असेल. नव्या चांद्रवर्षाची सुरुवात म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा मात्र २२ मार्चच्या आसपास कधीतरी असेल आणि तो चांद्रदिवस साजरा करताना सर्वसामान्याच्या कायम जाणीवेत असणाऱ्या तिथीबद्दल कोणताही गोंधळ होणार नाही. हे झाले तर सामान्य माणूसही हिरिरीने राष्ट्रिय कॅलेण्डराच्या वापरासाठी पुढे येईल व पूर्वीप्रमाणेच सौर व चांद्र अशी दोन्ही पंचांगे अबाधितपणे त्याच्या वापरात रहातील .

मात्र हा बदल होईतो राष्ट्रय कॅलेण्डर वापरूच नये असे मी म्हणणार नाही कारण राष्ट्रिय कॅलेण्डर वापरणे हा आपल्या राष्ट्रिय अस्मितेचा विषय आहे.

अजून एक बदल व्हावा असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचीही पार्श्वभूमी थोडक्यात पाहू या. महाभारतातील वर्णनाप्रमाणे त्या काळी द्वापर व कलियुगाचा संधिकाल सुरू होता (म्हणजे जशी दिवस व रात्रीच्या मधे संध्याकाळ असते तसा काळ). वैदिक कालगणनेच्या नियमानुसार अशा काळातच पुढील युग मोजायला म्हणजे युगाब्दाला सुरुवात होते. योगायोगाने याच काळात युधिष्ठिराला इंद्रप्रस्थाचे राज्य मिळून त्याने राजसूय यज्ञ केला व स्वतःच्या नावाने युधिष्ठिर शक सुरू केला. म्हणूनच युधिष्ठिर शक व युगाब्द हे एकाच सौर पंचांगाचे द्योतक आहेत. यानंतर सुमारे ०४४ वर्षांनी विक्रमाने विक्रमसंवत सुरू केला. त्याची गणना करताना अश्विन मासापासून वर्षारंभ मोजतात. विक्रमाच्या नंतर सुमारे १५५ वर्षांनी शालिवाहन शक सुरू झाला जो पुन्हा चैत्र प्रतिपदेला सुरु होतो. मात्र आपल्या पंचांगकर्त्यांच्या परंपरेला मानाचा मुजरा करावा लागेल कारण त्यांनी दुसरे पंचांग आले तेंव्हा दोन्हींप्रमाणे व तिसरे आले तेंव्हा तिन्हींप्रमाणे पंचांग मांडणी सुरू ठेवली. यात त्यांच्या सोईची गोष्ट ही होती की तीनही पंचांगांची गणना चंद्राच्या प्रतिपदेपासून होती. यामुळे आज आपण चालू वर्षाचे चांद्रपंचांग वाचायला घेतले तर त्यात युगाब्द ५१२०, विक्रम संवत २०७५, शालिवाहन शक १९२० व ग्रेगॅरियन २०१८ अशा चारही नोंदी दिसतात.

समितिसमोर हा प्रश्न होता की स्वतंत्र भारताच्या राष्ट्रिय कॅलेण्डरसाठी यापैकी सर्वात जुने, युगाब्दाची मोजमाप सांगणारे पंचांग वापरायचे की उत्तर भारतात जास्तकरून प्रचलित असणारे विक्रम् संवताचे की सर्वात अलीकडे सुरू झालेले शालिवाहन शक वापरायचे. आमचा देश अति प्राचीन काळापासून विकसित झाला आहे, जगाला एक अत्युच्च संस्कृति देणारा देश आहे, वगैरे एकीकडे सांगत असतानाच जे युगाब्द पंचांग ५००० वेक्षाही अधिक वर्ष अनवरतपणे मांडले गेलेले आहे व या देशाच्या ज्ञानोपासक परंपरेचा मोठा पुरावा आहे, ती गणना नाकारून आपली राष्ट्रिय गणना शालिवाहन शकापासून सुरू केली गेली याबद्दल वैयक्तिक पातळीवर मला हळहळ वाटते. शालिवाहन हा निःसंशयपणे पराक्रमी व आदर्श राजा होता पण युधिष्ठिर त्याहीपेक्षा मोठा होता. तरीही त्या दोन पंचांगांना नाकारण्याचे कारण माझ्या मते हे असावे की स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या इतिहासज्ञांना त्यांच्या इंग्रजी चष्म्यामुळे महाभारत अथवा विक्रमाचा इतिहास कपोलकल्पित वाटत असे. शिवाय आपण किती पुरातन यापेक्षा आपण किती नवीन हे दाखवणे हा ही हेतू असेल. मला मात्र आपण आपला पुरातन ठेवा विसरू नये असे वाटते. आणि अजूनही आपली संसद ही छोटी दुरुस्ती देखील करू शकते. मात्र त्याआधी आपण पुरातन नसून नवीन आहोत आणि युधिष्ठिर इतिहास नसून काल्पनिक होता ही गैरसमजूत झटकून टाकावी लागेल.
पूर्वी भारतात ' परशुराम शक' या नावाने एक सौर कालगणना प्रचारात होती. आजही केरळमध्ये तिचे अस्तित्व टिकून आहे. सौरपंचांग भारतियांना नवे नाही. त्यामुळे फलज्योतिषाच्या कारणासाठी चांद्रपंचांग अधिक परिचित वाटत असले तरी राष्ट्रिय कॅलेण्डरासाठी सौरपद्धति वापरून आपण जागतिक पद्धतिच्या जवळ रहातो, शिवाय ऋतुमानाची जाणीव अधिक स्पष्ट होते. यामुळे महिन्यांची नावे मधु-माधव इत्यादि केल्यास आपण स्वीकार केलेले सौर कॅलेण्डर अत्यंत वैज्ञानिक व निश्चितच अधिक परिपूर्ण आहे.

आता संपूर्ण जगभर ग्रेगारियन पद्धत असताना आपले वेगळे कॅलेण्डर कशाला असा प्रश्न काहींना पडतो. परंतु, आपल्यापैकी किती जण प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात ? तर लोकसंख्येपैकी फक्त एक टक्का लोकांचे परकियांशी प्रत्यक्ष व्यवहार चालतात. मग उरलेल्या ९९ कोटी लोकांना ही दिनदर्शिका स्वीकारण्यास काहीच अडचण नाही. शिवाय जगातील कित्येक देश देशांतर्गत व्यवहारांसाठी त्यांचे त्यांचे वेगळे कॅलेण्डर वापरतात हे ही आपण ध्यानात घेतले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या चलनात केलेले बदल स्वीकारले गेले. त्याचबरोबर वजन- मापांकरिता नव्याने प्रचारात आणली गेलेली मेट्रिक पद्धत तर बहुसंख्य जनता अशिक्षित असणाऱ्या भारताने इतर प्रगत देशांपेक्षाही सहजतेने अंगीकारली. आजही अमेरिका, इंग्लंडसारख्या काही प्रगत देशांमधील सर्वसामान्य जनता मेट्रिक ( दशमान )पद्धतीस फारशी सरावलेली नाही. याउलट भारतात मात्र आज सर्व दैनंदिन व्यवहार याच पद्धतीने होतात. त्यामुळे राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीच्या बळावर कालगणना पद्धतीतील परिवर्तनदेखील खचितच शक्य आहे. आणि भारताची लोकसंख्या, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक-षष्ठांश आहे. त्यामुळे परकीयांची अशास्त्रीय तपशील असलेली कालगणना झुगारून देऊन स्वदेशी व त्याचबरोबर संपूर्णतः विज्ञाननिष्ठ अशी भारतीय राष्ट्रि कालगणना वापरात आणून तिचा प्रसार करण्याचा संकल्प जर प्रत्येक भारतीय करेल, तर निश्चितच ही कालगणना वैश्विक वैज्ञानिक कालगणना म्हणूनही जगमान्यता प्राप्त करेल, यात शंकाच नाही. या दृष्टीने राष्ट्रिय कॅलेण्डराचा प्रचार-प्रसार व्हावा, त्याबाबत लोक-प्रबोधन व्हावे यासाठी देशातील विविध भागांमधून छोटे छोटे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडील माहिती समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे एवढे तरी आपल्या हातात आहेच.
(आभार प्रकटन – या लेखातील काही भाग राष्ट्रिय दिनदर्शिका प्रसारमंच तसेच जनता सहकारी बँकेकडून दरवर्षी छापल्या जाणाऱ्या सौर कॅलेण्डराबाबत माहितीवरून घेतला आहे)
---------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: